मुख्य सामग्रीवर वगळा

लेख क्रमांक .4 वनसंवर्धन दीन विशेष.....

                                       
               “मुलांनो हे जे १०० मजली सायन्स सेंटर तुम्ही पहात आहात हा विज्ञानाचा आणि मानवाने बनवलेल्या असंख्य अजब यंत्रांचा एक नमुना आहे. काही वर्षांपुर्वी ह्या ठिकाणी उंचच उंच जंगल आणि खडकाळ टेकड्या होत्या”, गुरुजी आम्हाला सांगत होते. एका दृष्टीने हा खरचं एक करिष्मा होता पण त्यासाठी आपण काय गमावलं आहे ह्याची जाणीव कित्ती लोकांना आहे? ही जंगी इमारत उभारण्यासाठी कित्तेक झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली. उंचच उंच टेकड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. इमारतीचा पाया घट्ट करण्यासाठी जमीनीच्या आतपर्यंत खोदकाम करुन आपण लोखंडी बार उभारले. आणि हे असे प्रकार ह्या एकाच ठिकाणी नाहीत तर जगभर चालु आहेत. कित्ती मोठ्ठ्या प्रमाणात मनुष्याने निसर्गावर अतिक्रमण केले आहे.
                               

                  कधी रस्ता रुंदीकरणासाठी, कधी वाढत्या शहरीकरणाच्या गरजा भागवण्यासाठी उभारलेली सिमेंटची जंगलं, तर कधी केवळ पैश्यासाठी चंदनासारख्या झाडाची वृक्षतोड आणि चोरी अशी अगदी आपल्या जवळपास घडणारी उदाहरणं देता येतील.

                 इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे, “देअर इज अ ऍक्शन फॉर एव्हरी रिऍक्शन”, ह्या उक्तीप्रमाणे कधीना कधी निसर्ग हे अतिक्रमण झुगारुन देणार हे निश्चीत. सुनामी, भुकंप, ज्वालामुखींचा उद्रेक, बदलते पर्जन्यमान आणि त्यानुसार बदलणारे निसर्गाचे हवामानचक्र हे त्याचेच प्रतिक आहे.

                 मनुष्य कितीही प्रगत झाला तरी आजही त्याचे जिवनमान निसर्गावरच अवलंबुन आहे. निसर्गाच्या छोटासा प्रकोप सुध्दा आपले जिवन हलवुन टाकु शकतो. मनुष्य आजही नैसर्गीक आपत्तींसमोर ठेंगणा आहे, हतबल आहे.
                                 
                ‘ग्लोबल वॉर्मींग’कडे लक्ष वेधण्यासाठी कधी बर्फमय शिखरांवर तर कधी समुद्राच्या तळाशी अनेक मिटींग्स झडल्या, परंतु त्या तितक्याश्या परीणाम साधु शकल्या नाहीत.
आजही तितकेच, किंवा त्याहुनही अधीक कारखाने, मोठ मोठ्या कंपन्या हवामान, पाणी, परिसर प्रदुषणाने भारुन टाकत आहेत. आजही ‘गो ग्रिन’ चा नारा लगावण्यासाठी आपण कित्तेक लिटर इंधन खर्च करत, हवेतील कार्बन चे प्रमाण वाढवत वाहनांचा मोठ्याप्रमाणावर वापर करतो आहेच. आजही स्वार्थासाठी निसर्गाची कत्तल चालु आहे.

                समुद्रपातळी वाढते आहे, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळतो आहे, पृथ्वीभोवतालचा ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी कमी होत आहे, हवामानात लक्षणीय बदल होत आहेत, पण इथे स्वार्थाची झापडं लावलेल्या अतीहुशार अश्या मानव-प्राण्याला त्याचे काय? जोपर्यंत प्रश्न समोर ‘आ’ वासुन उभा ठाकत नाही, तो पर्यंत त्याचा कश्याला विचार करायचा? आणि निसर्गाचा प्रकोप झालाच तरी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे तात्काळ कुठला-ना-कुठला देश त्यावर मार्ग शोधुन काढेल ह्या विचारातच आपण मग्न आहोत.

                निसर्गाचे संवर्धन होणे आवश्यक आहे असे पोटतिडकिने ओरडणाऱ्या चार लोकांची तोंड दाबली जात आहेत. तुम्ही जसे आनंदाने आयुष्य जगलात तसेच आयुष्य जगण्याचा आम्हा मुलांचा आणि आमच्या पुढील पिढीचाही हक्क आहे, हे का तुम्ही लक्षात नाही घेत आहात?

टिप्पण्या